बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा ; अन्यथा महामंडळाच्या कार्यालयाला टाळा ठोकू काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशारा
गडचिरोली,
"सत्तेत येण्याआधी घोषणा, आणि सत्ता मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या पाठीवर वार" – हेच सरकारचं वास्तव असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना बोनस देण्याचं मोठ्या आवाजात आश्वासन दिलं होतं. मात्र आज, कित्येक महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही पोहोचलेला नाही. खरीप हंगाम सुरू होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करण्यात आली नाही, त्यामुळे बोनसची रक्कम तात्काळ जमा करावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतीच्या हंगामाचे काम सुरू झाले असून शेती मशागतीला खर्च, बी बियाणे, मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात येत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना पैशाची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. मागील खरीप आणि उन्हाळी धान हंगामातही पूर परिस्थिती अवकाळी पाऊस आणि जंगली हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता शासनाने बोनसची रक्कम जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात 8 दिवसाच्या आत जमा करावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे आठ दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम अदा न केल्यास महामंडळ च्या कार्यालयाला टाळा ठोकण्याच्या इशाराही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.
0 Comments