दारूबंदी असूनही गडचिरोलीत अवैध दारूचा कहर – बेकायदेशीर दारूमुळे २१ निरपराध नागरिकांचे मृत्यू; प्रशासनाकडून तातडीने कठोर कारवाईची मागणी
गडचिरोली,
गडचिरोली जिल्ह्यात शासनाने कायदेशीररीत्या दारूबंदी लागू केली असतानाही प्रत्यक्षात जिल्हाभरात खुलेआम आणि बिनधास्तपणे अवैध दारू विक्री सुरू असून, या बेकायदेशीर व्यापारामुळे मागील काही महिन्यांत तब्बल २१ निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या गंभीर आणि वेदनादायक घटनांकडे लक्ष वेधताना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दारूबंदी केवळ कागदावर असून, प्रत्यक्षात बनावट, भेसळयुक्त आणि अत्यंत घातक दारू सर्रास विकली जात आहे. मागील तीन महिन्यांत २१ कुटुंबांवर काळाचा घाला कोसळला आहे. हे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर माणसाच्या जीवनावर थेट आघात आहे. जावेद खान यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधत अत्यंत नम्र पण ठाम शब्दांत म्हटले की, “माझी पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाकडे तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे. अवैध दारू विक्री करणार्यांवर केवळ कारवाई न करता कठोर शिक्षा व्हावी, आणि संपूर्ण टोळीचा छडा लावून या काळ्या बाजाराला कायमचा बंदोबस्त व्हावा.
दारूबंदीचे उल्लंघन हे महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर क्रियाकलापांवर पोलीस आणि महसूल विभागाने स्वतःहून कारवाई न केल्यास ते कर्तव्यात कुचराई” ठरेल, असे जावेद खान यांनी स्पष्ट केले.
हे मृत्यू कोणत्याही आजारामुळे झालेले नाहीत ही व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे झालेली हत्या आहे. जर शासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणा वेळेवर जाग्या झाल्या असत्या, तर हे प्राण वाचू शकले असते, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
जावेद खान यांनी शासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे की, दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र विशेष पथकाची स्थापना व्हावी, ग्रामपातळीवर जनजागृती मोहिमा राबवाव्यात आणि या मृत्यूंमागील दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात उभे केले जावे.
0 Comments