प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तेसर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा – कृषिमंत्री दत्तात्रेय भरणेराज्यातून गडचिरोलीसह इतर ८ जिल्ह्याचा समावेश

प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा – कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे
राज्यातून गडचिरोलीसह इतर ८ जिल्ह्याचा समावेश
गडचिरोली, 
प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेची घोषणा केंद्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या योजनेचा शुभारंभ दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथे होणार आहे.

या वेळी महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, पुणे येथे पार पडणार असून, या कार्यक्रमात राज्यातील कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील काम करणारे ३०० हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. ही योजना देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल तरी सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील आयोजन

गडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेचा शुभारंभ कार्यक्रम जिल्हा नियोजन सभागृह, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांचा सहभाग याप्रसंगी राहणार आहे.

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमासाठी सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, शेतकरी गट प्रतिनिधी, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, पीक स्पर्धा विजेते आदींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश

केंद्र शासनाने या योजनेअंतर्गत देशातील कमी उत्पादकता, कमी सिंचन क्षमता व पतपुरवठ्याच्या अडचणी असलेल्या १०० आकांक्षित जिल्ह्यांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्रातील गडचिरोली, पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.

योजनेचे उद्दिष्ट

या योजनेद्वारे देशभरातील ३६ हून अधिक केंद्र व राज्यस्तरीय कृषी योजनांचे अभिसरण करून पिकांची उत्पादकता वाढविणे, उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीनंतरची तंत्रज्ञान व्यवस्था व पतपुरवठा प्रणाली मजबूत करणे हे उद्दिष्ट आहे.


थेट प्रक्षेपणाची व्यवस्था

सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध राहणार असून सर्व जिल्हा मुख्यालय, तालुका मुख्यालय, ग्रामपंचायती, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच प्राथमिक कृषि पतसंस्था (PACS) येथे प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments