नद्यांबाबतचे सत्य समोर आणून उपाययोजना कराव्यात – डॉ. राजेंद्रसिंह

गडचिरोली :

 

नदी ला जाणून घेत असताना अतिक्रमण, प्रदुषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अभ्यासही आपणाला करावा लागेल. यासाठी शासन व प्रशासन आणि नागरीकांनी एकत्र येवून प्रयत्न केले पाहिजेत. ‘चला जाणूया नदीला’ हा चांगला उपक्रम शासनाने सुरू केला आहे. मात्र या उपक्रमाची अंमलबजावणी करीत असताना नद्यांबाबत असलेले सत्य समोर आणून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण सत्य स्थिती अभ्यासून नद्यांना खऱ्या अर्थाने अमृत वाहिन्या करूया, अशी भावना जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाअंतर्गत नदी संवाद यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार कृष्ण गजबे, पद्मश्री परशुराम खुणे, वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे, डॉ.सुमन पांडे, प्रविण महाजन, नरेंद्र चूग, रमाकांत कुलकर्णी उपस्थित होते.

आपल्यासह सभोवताल असलेल्या निसर्गातील सर्वांनाच पाण्याची गरज आहे. नद्या या प्रत्येक भागात पाणी नेवून पोहचविणाऱ्या अमृत वाहिन्या आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यापासून त्यांच्यावर होणारे अतिक्रमण व प्रदुषण रोखण्यासाठी आपणाला त्यांच्या जवळ जावून अभ्यास करावा लागेल, असे डॉ. राजेंद्र सिंह यावेळी म्हणाले.

खासदार अशोक नेते यांनी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद करून नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्यांचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पद्मश्री परशुराम खुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.किशोर मानकर, आ.कृष्णा गजबे यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी कठानी नदीचे प्रहरी मनोहर हेपट, पोटफोडी नदीचे प्रकाश अर्जुनवार, खोब्रागडी नदीचे केशव गुरूनुले, सती नदीचे डॉ. सतीश गोगुलवार यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी संवाद यात्रेत केलेल्या कामाचे सादरीकरण केले.

स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

उत्कृष्ट लोकसहभागाबद्दल चारही नदींवरील गावांमधून प्रत्येकी दोन दोन गावांचा सन्मान करण्यात आला. यात खोब्रागडी नदीवरील प्रथम क्रमांक डोंगरगाव तर द्वितीय क्रमांक नवरगाव या गावाचा आला. कठाणी नदीवरील जेप्रा प्रथम तर द्वितीय आलेल्या दुधमाळा गावाचा सन्मान केला. पोहार पोटफोडी नदीवरील प्रथम क्रमांक शिवनी गावाला तर द्वितीय पुरस्कार जांभळी गावाला मिळाला. तसेच यावेळी निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनाही प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments