केंद्र सरकारची ९ वर्षातील कामे घराघरात पोहोचवा- डॉ.कोठेकर

केंद्र सरकारची ९ वर्षातील 
कामे घराघरात पोहोचवा- डॉ.कोठेकर
महाजनसंपर्क अभियानासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले चार्ज


गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने ३० मे ते ३० जून यादरम्यान राबविल्या जात असलेल्या महाजनसंपर्क अभियानासाठी मंगळवारी (दि.३०) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक गडचिरोलीत झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॅा.उपेंद्र कोठेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात झालेली सर्व कामे घराघरात पोहोचवून त्याचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल लॅन्डमार्क येथे झाली. यावेळी डॅा.कोठेकर यांनी, महाजनसंपर्क अभियान गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रातील संपूर्ण बुथ स्तरापर्यंत यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चार्ज केले. युवा पिढीला प्रेरित करण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसार, प्रसिद्धी करण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या सभेच्या सुरुवातीला चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार स्व.बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, लोकसभा संयोजक विरेंद्र अंजनकर, जेष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, प्रदेश सरचिटणीस एस.टी. मोर्चा प्रकाश गेडाम, चंद्रपूर जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

९ वर्षात झाला तिप्पट विकास- खा.नेते
या पदाधिकारी बैठकीचा समारोप करताना खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात एकहाती सत्ता असताना ६० वर्षात जेवढा विकास केला, त्याच्या तीन पट जास्त विकास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षाच्या कार्यकाळात सर्व क्षेत्रात केल्याचे सांगितले. ही सर्व विकास कामे जनतेच्या घराघरांमध्ये पोहोचविण्याचे कार्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे आणि महाजनसंपर्क अभियानाला मनाने, एकाग्रतेने काम करून भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीला आणखी पुढे न्यावे, असे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.

Post a Comment

0 Comments