गडचिरोली,
मागील सहा-सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज भर पावसात गडचिरोली तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
तनुश्री आत्राम यांनी येवली येथील तलाठी श्री. वासनिक यांच्यासमवेत येवली, गोविंदपूर, दर्शनी इत्यादी गावांना भेट देऊन पुराने बाधित शेतीची पाहणी केली. शिवाय मुडझा येथील तलावाची पाळ फुटल्याने शेती आणि मच्छिमार समाजाचे मोठे नुकसान झाले. तलाव फुटल्याच्या आपत्तीमुळे गावातील कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी तलावाच्या लाभक्षेत्रातील ५० हेक्टर पेक्षा अधिक शेतातील नुकतेच रोवणे केलेले धानपिक खरडून वाहून गेलेले आहे. तर मुडझा गावातील ८० हून अधिक भूमिहीन - अल्पभूधारक ढिवर समाजाच्या मच्छीमारांनी वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्था, मुडझा अंतर्गत सदर तलावात चालू हंगामाकरीता नव्याने सोडलेले दिड लाख रुपये किंमतीचे मत्स्यबीज आणि मागील हंगामातील पालन केलेली प्रती नग २ किलोहून अधिक वजनाची २ टनांहून अधिक विक्रीयोग्य मच्छी वाहून गेली. या आपत्तीमुळे ढिवर समाजाच्या मच्छीमारांपुढे उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे सदर आपत्तीची आपल्या स्तरावरुन गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छीमार सहकारी संस्था, मुडझा यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होवून जिल्हा प्रशासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळाले पाहिजे तनुश्री आत्राम यांनी या तलावाचीही पाहणी केली. शिवाय नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छिमार बांधवांशी चर्चा केली. शासनाने तत्काळ पूरबाधित शेती आणि घरांचे सर्वेक्षण करुन पीडित नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तनुश्री आत्राम यांनी प्रशासनाकडे केली आहे.
वाकडीच्या शाळेत वृक्षारोपण
पूरग्रस्त भागाची पाहणी करताकरता तनुश्री आत्राम वाकडी गावात पोहचल्या. यावेळी त्यांनी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण केले. याप्रसंगी शिक्षकवृंद आणि नागरिक उपस्थित होते.
0 Comments