शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करा - शेतकरी कामगार पक्षाची मागणी


शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करा

शेतकरी कामगार पक्षाची मागणी


गडचिरोली : मागील काही वर्षात गडचिरोली जिल्हा व शहरातील वाहतुक वर्दळीत वाढ झालेली असून वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. वाढती वाहतूक आणि अपघातांच्या दुर्घटना थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांची भेट घेवून त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील गांधी चौकातील गोल सौंदर्यीकरणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांचे उल्लंघन झाले असून त्यामुळे सिग्नल स्पष्ट दिसून येत नाही. परिणामी सिग्नल चालू आहेत की बंद हे न समजल्यामुळे वाहनधारक वेळेच्या आधीच वाहने क्रॉसिंग करतात. व दुसऱ्या वाहनांना धडकण्याच्या घटना घडतात. करिता सदरचे सौंदर्यीकरण हटविण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला आपल्या विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

गांधी चौकातील सिग्नल अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे बंद असतात. त्यावेळी वाहतूक शिपायांनी वाहतूक नियंत्रण करणे क्रमप्राप्त आहे, मात्र तसे होत नाही तर सर्व वाहतूक शिपाई वाहतूक नियंत्रण करणे सोडून केवळ चौकातील आरमोरी रोडवरील वाहनांना चालान देण्याच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे सदर चालान देणाऱ्या वाहतूक शिपायां व्यतिरिक्त किमान ४ रस्त्याला ४ वाहतूक शिपाई वाहतुकीच्या नियंत्रणाकरिता नव्याने नियुक्त करावे. जिल्हा न्यायालय जवळील चौक, आयटीआय चौक, कारगिल चौक व शिवाजी महाविद्यालय चौकात वाहतूक नियंत्रणाकरिता प्रति चौक किमान २ वाहतूक शिपाई नियुक्त करण्यात यावेत. दुचाकी, सामान्य नागरिकांच्या चार चाकी वाहनांकडून ज्या पद्धतीने विविध कलमान्वये दंड वसुली करण्यात येते त्याचप्रमाणे शहरातून होणारी अवजड वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक करणारे ट्रॅक्स, ट्रॅव्हल्स, रेती - मुरुमाची तस्करी करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांचे कडूनही नियमोचित दंड वसुली अभियान नियमित राबविण्यात यावे. गडचिरोली शहरा करिता मूरखळा - सेमाना माडेतुकूम - अडपल्ली असा बायपास / रिंग रोड ची आवश्यकता असून त्याबाबत आपले विभागाने शासनास सदर बायपास / रिंग रोड मंजुरी करिता पाठपुरावा करावा. शहरातील नागरिकांना सोयीचे होणे करिता नगरपरिषदेने डीपी प्लान नुसार शहरात सर्विस रोडच्या आवश्यकते संबंधात प्रशासनाला आपल्या वतीने कळविण्यात यावे अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे.

दरम्यान शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेवून येत्या पंधरा दिवसांत शहराच्या वाहतुक व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी दिले.

Post a Comment

0 Comments